if (typeof document.onselectstart != "undefined") { document.o

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

पतंग मैत्री

  तुझे पाय लागले आभाळी, मी नाचतो धरणीवरी.

किती घेशील गरगर गिरक्या, तुझी वेसण  माझ्या करी.


तूच माझा अबोल सखा , बालपणीचा साथीदार.

वाटले तुझ्या सारखा विश्वासू , न मिळेल मज जोडीदार.


जाऊ भटकू रानामध्येे , दूर दूर मैदानावर.

आपली मैत्री जमेल पक्की,  जसे धरणी आकाश क्षितिजावर.


आकाशीचा फिरता वारा , आहे खट्याळ फार.

तुला सांगेल  जाऊ दूरवर, फिरत फिरत गगनपार .


एके दिवशी अवचित घडला,  एक चमत्कार.

मैदानाच्या अंगणात, तुज भेटला साथीदार.


तुज म्हणाला कैदी होऊन, कशाला भोगतोस तुरुंगवास.

दुसऱ्याच्या हातची कठपुतळी होऊन, नाचत जाईल आयुष्यपार


चल एकमेका मदतीने तोडू बंधने ,

मुक्त होऊन फिरत राहू, आकाशाच्या सदने.


साथी मिळताच तू तोडला मैत्रीचा अपुला धागा .

मज सोडून निघालास आकाशीच्या अंगणा.


 तू पण निघालास स्वार्थी माझ्या सवंगड्यांपरी.

मज सोडून निघून गेलास दूर गगनापरी .


गेलास म्हणून नाही खचनार मी .

माझे आयुष्य आनंदाने जगणार मी.


निशिकांत हारुगले


सत्याचा सूर्य

 सारीपाट हा संसाराचा खेळ चालला नशिबाचा,

माणसाच्या या जगामध्ये डाव मांडतो जीवनाचा.


गोल गोल फिरत्या जगामध्ये न मिळे स्थिर कुणी,

क्षण येतो क्षण जातो धावती सर्व चाकोरीतूनी. .


मिळाला न मज जीवनी कोणी सखा कायमी,

स्वार्थाच्या या जगामध्ये सर्वच विसरले माणुसकी.


वसुंधरेवर राहुनी स्वप्ने पाहतो गगनाची, 

घेऊनी आकाशी भरारी करत रहावी मुक्त स्वारी.


जन्मा आलो राबत गेलो गेली काया झुरत, 

स्वार्थी जगात पाहतो माणुसकी राहिली आहे का परत.


एकास दुजा शेंड्या लावतो जगाच्या व्यवहारात,

पण फसविणारा स्वतःच फसतो स्वार्थाच्या बाजारात.


दिस उगवे दिस बुडे रात्री चालल्या सरत,

मानवी स्वार्थी दुनिया चालली गोल गोल फिरत. 


दिवस येईल एक असा सरेल अंधकार,

सत्याचा सूर्य प्रकाश उजळून दिसेल क्षितिजपार.

निशिकांत हारुगले 

जीवन

 जीवनाचा आनंद लुटूया आपण सारे,

बेधुंद तरुणाईचे पिऊया आपण वारे.


भूवरी राहून उडूया आकाशामध्ये,

सुंदर पाखरु होऊन दाखवू जगा दिवास्वप्ने.


अशी तरुणाई चिरकाल टीकत जावी,

आयुष्याच्या वाटेवर सतत फुलत रहावी.


तरुणाईच्या वाटेवरी मिळावा एक साथी,

त्याने साथ द्यावी मित्र होऊन हाती.


जीवनी जीवन फुलत जावे  गुच्छाप्रमाणे,

तयाचा सुगंध पसरावा कस्तुरीप्रमाणे.


वेड्यावाकड्या जीवनाच्या पाऊल वाटा,

एकमेकां साथीने चालुया आता चला .


कसे होऊन बेभान पाखरू फिरते नभात रे,

तशी घेऊ भरारी जाऊं उंच गगनात रे .


चला उंच उंच चढू यशाच्या वाटा ,

आडवे येणाऱ्यांचा काढत जाऊ काटा.


किती गेलो  उंच यशाच्या शिखरी,

तरी विसरणार नाही  माणुसकी.


निशिकांत हारुगले




रास

 आकाशी चांदवा प्रकटला कोजागिरी पूनवेचा ,

अम्हासवे टिपऱ्या खेळतो नाथ पंढरी नगराचा.


भिमेतीरी जमली वैष्णव मंडळी,

आम्हीं भोळ्या मराठमोळ्या पोरी .


आम्हा फसवू पाहू नको तू केली गोकुळात चोरी,

गोडगोड बोलून लोणी खाऊन केलीस शिरजोरी .


दिसतोस सावळा, साळसूद भोळा, आहेस रे लबाड .

आम्हा गोपींजवळ बागितलेस तू दूधा लोण्याचे घबाड .


वाजवून पावा प्रेमाचा चाळा फसवतोस तू सर्वांना ,

असेच फसवून वरीलेस तू,  आमच्या भोळ्या रुक्मिणीला.


रुसला  ग नाथ वाटत बाई,  आमच्या कडू बोलण्याला .

चला समजूत काढू त्याची, खेळूनी रासलीला .


वाजावा सुमधुर पावा बाई भीमेच्या रणात,

रास रंगावा टिपऱ्या टाळा सवे पंढरीत .


कानात कुंडल डोईत मोरपीस दिसतो साजिरा सुंदर

देखणा ग बाई गोजीरा , आमचा रमेचा वर,


भरीले रांजण दुधाचे बाई त्याने प्रेमाच्या सागरात ,

प्रेमाची भरती आली  हो भामाबाईला ,


रासाच्या रंगात दुधाच्या रांजनात उतरला चांदवा नभीचा,

लुटुया क्षीराचा आनंद कोजागर पूनवेला.

निशिकांत हारुगले


नवनीत

 घुसळनी तू घुसळनी तू रांजण गाज गाजे,

उसळी घेत वरती खालती ताक ते हो बोले. 


कुठे लपला आडोशाला तो श्याम सावळा,

त्याची वाट पाहतो रांजणी नवनीताचा गोळा.


कशी रवी फिरते दोरी साथीने रांजणात,

वेडी झाली ही राधा नंदकुमाराच्या प्रेमात.


कृष्णकुमाराचा पावा गोकुळात वाजतो ,

कपिलेंचा कळप यमुनातिरी चरतो.


कपिलेची धार दोन्ही करांनी  काढावी,

क्षीराच्या धारेने मडकी भरून रहावी.


अशी क्षीराची धार दह्यात बदलत जावी .

पांढऱ्या पांढऱ्या दह्यात नीरधार मिसळावी,


गोल गोल रवी त्यात अशी फिरावी,

नवनीताचे भांडार वरती घुसळून यावी.


उचल तो गोळा राधे ठेव शिंक्याला, 

त्यावर गोकुळाचा चोर टपून ग बसला. 


गोळा ठेवून शिंकी राधा गेली पाण्याला,

माजदारान येऊन डाका त्याने घातला . 

कोठीतून राधेचे श्रम चोरून गेला.


चोरी नाही केली मी म्हणे श्रीकृष्ण ग सावळा,

कपिलेच्या राखणीची राखोळी मी वाटी सवंगड्यांना.

निशिकांत हारुगले

वातचक्र

 गर गर गर आला गोल गोल फिरत,

पवन देव घुमतो धरणी आकाशाच्या मध्यात.


त्याच्या बरोबर खेळाया गेली पाने फुले,

वातचक्राचा आनंद पाहतो , आम्ही लहान मुले .


कपडालत्ता ही त्यात आला सर्व कचरा,

त्याच्या सवे मारतो धुरळा गोल गोल चक्करा.


मोठं मोठाली झाडे लागली त्यासवे डोलाया,

डोलून लागली त्यांना भोवळ माराया.


पाणाड्याचा पाणचक्का उडूनी गेला त्यात,

जाऊन पडला मेसाच्या उंच गेचक्यात.


रुईच्या झाडावरची आजी त्यात गेली,

गोल गोल फिरत गाणी म्हणायला लागली.


वातचक्र गेला चिडून गावाच्या मध्यात , 

घरोंद्याची कौल घेऊन आला परत.


सगळी माणसे इकडे तिकडे पळायला लागली,

वेड्यासारखी चहूकडे करायला लागली.


वातचक्र म्हणाले ,"चला मुलांनो संगे."

जाऊ गोल गोल फिरत आकाशीच्या सदने,


मुले म्हणाली वातचक्रा नको तुझी संगत.

आम्ही मुले आनंदी आहोत धरणी मातेच्या कुशीत.

निशिकांत हारुगले

प्रेम



हृदयदी भाषा ते हृदयची जाणते,

प्रीत ही माझी तुझवर येऊनी थांबते .

कसले हे अमोघ बंधन आहे ना ,

सारे म्हणतात ते प्रेम हेच का.


नयनातूनी जुळवी ते अनोखे बंध ,

कुसुमातुनी पसरावा प्रीतीचा सुगंध .

तसे दळवळावे आपले जगात जीवना,

प्रेम म्हणतात ते हेच का?


अणु अणु मधूनी घडावे विश्व ,

चरा चरातून जोडत जाई अनुबंध ,

अग्नीत जाळूनी दाखवावे अमरत्व .

दिपावरील श्रेष्ठ पतंग्याचे हे प्रेम .

कसले हे बंधन प्रेमा?

सारे म्हणतात ते प्रेम हेच का?


कसा सुटावा विपणी सुगंध कस्तुरीचा ,

वेड लागूनी धावावा मृग तो मनीचा ,

अंत करून सोडते तेच का ?

शेवट हा प्रेमाचा असा का ?


वेड लावते पद्मज कृष्ण वर्णी भुंग्याशी,

जाळ्यात अडकुनी आपल्या स्पंदने घेई हृदयाची.

काष्ट फोडणारा अडके नाजूक बंधासी ,

गुदमरून जाऊन देई बाजी प्राणांची .

असले कसले हे बंधन प्रेमा ?

शेवट व्हावा जगण्याचा असा का ?


प्रेम नव्हे जगणे नी मरणे ,

प्रेम त्यागाच्या यशाचे आहेत निखारे ,

प्रेमातून वाढे वंश जीवनाचे ,

नव्हे वासनेचे बंध प्रेमा?

त्यागाने येई अमरत्व प्रेमाला.


निशिकांत हारुगले








जय गोदावरी

 जय  जयतू  गोदावरी देवी महाराष्ट्र माता,

सह्यगिरी गिरीवर पुत्री नमन तुज आता.

जय देवी गोदावरी दख्खन पथ गंगा  ll



गोपाप क्षालना आणीली तुज गौतमाने,

साळी उगवून अनेक जीव रक्षिले तयाने.

दंडकारण्य सुशोभित करत चालली वेगाने,

त्र्यंबकेश्वरीची  नागीण धावते जोराने  ll


शुरपणकेचे नाक छाटीले तुज काठी लक्ष्मणाने,

रामायणाचा अध्याय घडला तुझ्याच तिराने. 

      जळा जळातून उभारले तुझ्या अनेक संत,       

          समानतेचाेचा संदेश देती एकनाथ ll


मराठवाडा सजवत चालली देवी,

सुखात जा तू नांदण्या तू आंध्रप्रदेशी.

खुणावून बोलावे तुझ बंग सागर ,

तोच तुझा पती परमेश्वर ll


नांदूनी तुज आठवण येईल माहेरची,

 बाष्प रूप घेऊन भेटाया ये सह्याद्रीच्या मुलखी ll

निशिकांत हारूगले






वैशाख मास

 गेला फाल्गुन मास , सरले चैत्राचे दिस,

ग्रीष्माचे उन घेऊनी आला वैशाख मास.


पूर्वक्षितीचा रविराज आकाशी झळकला,

तरूची हिरवी दुलई घेऊनी गेला.


पिवळ्या पिवळ्या फुलांची नक्षी रानी सजली, 

प्रणयप्रर्भेचा रंग सगळीकडे उधळू लागली.


कलकलाट चालला भोर्ड्यांचा मेसात,

मोरांचा केकारव ऐकू येई रानात.


तहानलेल्या धरणीला मोठ्या मोठ्याल्या चिरा ,

तृप्त करण्या येशील वरूनिराजा रे केव्हा.


ग्रीष्माच्या वणव्यात आमराई बहरली,

पाना पाना आड आम्रकैरी दडली. 


लपत छपत जाऊन कैरी पळवावी, 

आंबट गोड आंब्याची चव चाखून पहावी. 


असा वैशाख मास पुन्हा पुन्हा यावा ,

सुख दुःखाचा संदेश घेऊनी जावा.


निशिकांत हारुगले 


पारध

 कोदंडावरी प्रत्यंचा चडवूनी निघाला तो रानी

मावळ हाती तयाच्या शर  तो काळ रुपी.

नयनातुनी उसळे त्याच्या अनलाच्या ज्वाला,

कार्मुकाशी करत चालला तो पारधी चाळा ,

अरण्याचे रान चालती पद ते जोरात,

मृत्त्यूदेवता  चालती मागोमाग वेगात.

दृष्टास दिसतसे दृष्टच सृष्टी सारी ,

निसर्गाचे सौदर्य नच डोळा पाही.

सुंदर वेली लता बहरती रानावनात,

मधुर विहग गोडवा घुमतसे कानात.

त्याला न भान या सुंदरतेचे,

दुष्ट नयन शोधती पारध आकाशीचे .

निर्जन स्थळी थांबले चरण काळाचे,

सामोरी दिसे आम्रवृक्षी पारध द्विजाचे.

चढली प्रत्यंचा कोदंडी तीव्र शराची ,

निघाला तो तीर शिकारण्या द्विजाची .

फडफड करत कोसळला खाली द्विज,

एकच कल्लोळ माजला नभी पक्षांत.

क्रूर  हास्य उमटले त्याच्या गालावरती,

पारध यशस्वी जाहले वाटले शिकारी.

भुवरूनी उसळला पुन्हा द्विज,

आयुष्य उपभोगण्या निघाला आकाशात.

पुन्हा वेधण्या प्रत्यंचा ताणली गेली तेव्हा,

सळसळत येऊनी डसाला अही पायात.

पारध करण्या आला होता तो पारधी रानी,

स्वत पारध होऊन गेला यमलोकी.


निशिकांत हारुगले










मराठी बोली

 थाट पहावा मराठीचा प्रांता प्रांतातून,                                

 अनेक उगवी बोल ते दहा कोसातून,

राहणे बाई माझे सागर शेजारात,सह्याद्रीच्या पश्चिम तिरात,

नासिक रंजन बोली ही , नथ बोले वरखाली होऊनी.

अशी आमची सुंदर कोकणची बोली,

मालवणच्या सिंधूदुग् पासून ठाणे करी.

थाट पहावा मराठीचा... ...l l


अपरांत देशातून निघालो पूर्वेच्या कडा

नांदण्या मराठी निघाली घाटाच्या देशा,

तलवारीची जात माझी मी दिसते नाजूक,

भगवी पताका फडकते कुंतल देशात,

घाटीचा हा थाट पहावा रांगड्या मुलखात,                    

शिवशाहीचा भगवा डोलावा सह्याद्री शिखरात.

अशी आमची सुंदर साजिरी घाटोरी बोली,

मलप्रभे पासून नांदते भीमेच्यातीरी.

थाट पहावा मराठीचा... ...ll


उभी राहते मी हो बाई शाळूच्या  रानात,

देवगिरीचा किल्ला शोभे मराठवाड्यात,

घडावा कलेचा साज बाई पैठणी शालुवरती,

अशमक खोऱ्याची आहे मी महाराणी.

अजंठा वेरूळ ची कला पहावी गोदेच्या खोऱ्यात,

अशी सुंदर साजिरी बाई मराठवाडी बोल

तूरा खोवतो मानाचा किल्ले देवगिरीवर 

थाट पहावा मराठीचा... ... .ll


झुळ  झुळ वाहे पाणी तापी पूर्णेचे,

केळयांची बाग बहरली जळगाव प्रांते ,

बहिणाईची गीत सांगती मराठीचा ढंग,

मराठीचे उत्तर टोक अहिराणी बोल,

तापी पूरणेच्या पाण्याचा पडावा मुक्तनगरी वळसा,

चांगदेव मुलखाचा थाट पहावा अहिरान खानदेशा.

अशी सुंदर साजिरी अहिराणी बोल,

मराठीचा तुरा खोवते बऱ्हाणपूर सीमेवर

 थाट पहावा मराठीचा... ...ll


सातपुड्याच्या मुली नांदती विदर्भ खोऱ्यात

वैना वर्धाचे सुंदर खोरे चंद्रपुरात,

धानाची ती पात डोलते भंडार प्रांती,

कपाशीची बोंडे खुलती नागपूर देशी,

नांदते बाई मी रूक्मिनीच्या  माहेरी,

मराठीची लाडकी लेक माय मी वऱ्हाडी.

थाट पहावा मराठीचा... ...ll


नांदते मी अपरांतपासून  विदर्भ प्रदेश 

कुंतल पासून थेट अश्मक  देश

गावरान बोल जरी वाटती अहो आम्ही ग्रामवासी

मराठीच्या आम्ही मुली नांदतो महाराष्ट्र राज्यी

थाट पहावा मराठीचा... ...ll


निशिकांत हारुगले













भामा

 तुझ्या प्रीतीने वेडी होऊन धावते रे देवा,

दर्शनाने कृतार्थ करा या वेड्या जीवा.

घेऊनी उडी सह्यद्री शिखरावरुनी,

 व्हळ होऊनी नीर रूपाने आले तव चरणी,

देवा आले तव चरणी.

भीमथडीच्या तटामधुनी. उसळे मज  नीर

दर्शना तुझीया आले देवा सत्यभामादेवी ,

रासलीला यमुनाजळी ,माझ्या तीरी वैष्णव मेळा,

कारे अव्हेर माझा केशवा,एकदा तरी यावे माझ्या तीरा,

करीन सेवा तुझि रे मी प्राणपणाने.

आकाडात वरुण कृपा करता,मज सव्रागा  भरती येते 

तूझ्या दर्शना आडवती मज तुझे हे वेडे. वैष्णव भक्त,

ही सारी रे तुझीच लीला,मी ओळखते तुझा कावा.

कितीतरी बांधणे घाला तरी नित्य कलशातूनी दर्शना

येईल माझे जल मंदिरा,

उतरतील त्या जळधारा,  तव अंगावरती  .

 स्नान घालूनी निर चालले, भूमातेच्या उदरी,

निरोप द्यायला निघाले श्रीहरीचा भीमेच्या तीरी 

असे अनोखे मिलन आपले सदैव राहावे सृष्टीमधे 

करावे मजला तृप्त नित्यनेमाने ,देवा नित्यनेमाने,


निशिकांत हारुगले



















































लावणी गीत

 

लावणी गीत...


घन घन. माला दाटली नभात,

टप टप टापा टाकीत आला

वरुणीराजा अंगणात.

मृग सरला अडद्रा गेली गेला पुनर्वसु,

पुष्याच्या पावसात चिंब चिंब भीजू.

रोप उगवून साळीची बाळसे धरावं आली ,

लागण कराव जमलो आम्ही मावळ पोरी.


आम्ही घाटोरी घाटोरी सह्याद्रीच्या मुली,

रोप लावीतो साळीची तांबड्या माती मधी.

कोकण  मुलखाचो  राजे वरूनी चालूनी आले ,

आले हो आले, कोकण मुलखाचो राजे,

त्याने धरील फेर आभाळ माथ्याले ,

थुई थुई पाणी रानात करायले.


बसव चाले रानात, लोणी घुसळे वावरात,

हिरवी सपानं दडल आमच्या मनात.

भाद्रपदात गवर रानात खेळुदे,

हिरव्या भाताची नागफणी रानात डोलू दे.


 नागफणी रानात रानात डोलेल,

रास धानाची धानाची खळ्यात रचेल.

महादेवाची देवाची कृपा होईल

आई लक्ष्मी लक्ष्मी कणगात भरेल.

 निशिकांत हारुगले



श्रीहरी विठ्ठल

  हरी हरी श्रीहरी पळाला कुठे श्रीहरी,

शोधती वैष्णव मंडळी, पंढरीच्या रणातूनी.


इथे शोधू  की तिथे शोधू , पंढरीच्या रायाला.

शिणोठा घालवाया देव गेला ,नंदवाळ नगराला,


रात्रीचे बारा वाजता, दाराची कडी गाजता  .

राई म्हणे रुक्मिणीला ,कोण ग पाहुणा  आला.


 दारी उभा विठ्ठल पाहून, हर्ष झाला मनाला .

सेवेशी सिद्ध जाहल्या, अष्टनायका.


रुक्मिणीने घातला पलंग, अंथरूण घातले राईन.

वारा घाले लुमावती, पावले चेपती जांबुवंती .


सेवा करत  चालली रातराणी सरत.

सोडायचा नाही नाथ आता, काहिकेल्या परत .


नंदवाळ नगरात, करवीर क्षेत्रात .

विसावा घेतो जगाचा जगन्नाथ .


पहाट समई धुंद गारवा सुटला.

साखरझोपेत गेल्या अष्टनायक .


पंढरीच्या रणातून पहाटे हाक आली विठ्ठला .

जगत राजा चालला पुन्हा वैष्णव भेटीला.


प्रभात समयी जाग आली अष्टनायका .

शोधा शोध घेत चालल्या चहू मुलखा .


रुक्मिणी काढे समजूत सर्व बायांची.

रात्री बारा वाजता कडी गाजेल परत दाराची .


निशिकांत हारुगले

विद्यादेवी

 कंठातूनी प्रकटले ओंकार स्वरुपात,

श्रीगणेशा करून करू तयाची सुरवात.


प्रकटले ते स्वर मंजुळ मुख कमलातून,

दंततालव्य वाजवीत जिव्हा करे साथ.


यावे शारदे स्वीकारावे माझ्या पूजेस,

आशीर्वाद देऊनी तारावे निज भक्तास.


करातील करंगळी करते वाकुनी तव  मुजरा,

तयावरती स्वार झाला मरंगळीचा फेरा ,


अंगठ्यासवे अनामिका तिज साथ मधल्याची ,

मोरपीस शोभते तयाचेया करी .


प्रकटली ताडपत्रावरती तू शारदादेवी .

बुध्दीदेवता  आदेश देते ती ब्रम्हस्वरूप ,

कसे सत्य चिरकाल टिकावे या विश्वात,


जाहले बंधिस्त श्रेष्ठ ज्ञान त्या ग्रंथात,

उघडताच पाने प्रकटावे  तत्पर  जगात  .


ज्ञानाच्या  गोणी लादाव्या पाठीवरी ,

तरुण जाऊ हा संसार मोह मायारुपी ,


तुझी साथ आम्हा असावी नित्यनेमाने,

सेवा  घडावी तुझी प्राणपणाने ,

घडो जीवनी जीवन ज्ञानाने .

निशिकांत हारुगले 

सागवेळू

 सागवेळूच्या बनात, करारती वेत.

गोडगुंजन भ्रमरांचे तळ्यातील कमळात.

वेड्या वाकड्या ओढ्याचे पाणी खळाळत गाजे.

तहानलेल्या झाडोय्रांना सुखावत चाले.

कापूस पिंजला अंबरी काळया पांढऱ्या मेघांचा,

खेळ चालला चालला श्रावणी उन पावसाचा .

हिरव्या गर्द झाडीतून गूज कोकीळ बोलतो,

मधूर कुहुकुहू गीत कानात पडते,

थुई थुई पावलांवर मुयुर नाचतो रानात,

रंगीबेरंगी पिसारा त्याच्या फुलतो अंगात,

गोल रिंगनाच्या तळ्याच् नीळ नीळ पाणी,

मासोळ्यांचा खेळ रंगला लपाछपीचा जळी.

फुले नाजूक नाजूक सुंदर साजिरी फुलली, 

तयांचा मकरंद मधमाशी हळूच पळवती .

झूळूक वाऱ्याची गाते घुम घूम गीत , 

कसे वाद्यांविन वाजे निसर्गाचे संगीत. 

अशा सुंदर श्रावणात फिर फिरावेसे वाटते ,

सह्याद्रीच्या कुशीत निज निजावेसे वाटतें.


निशिकांत हारुगले



प्रणय गीत

 प्रणय गीत

झिम्माड पाऊस चिंब भिजवून शहारे आणि अंगा,

आठवण येते तुझी साजना या श्रावण दिवसा.

म्हणूनच आलो तुझ ओढीने भेटाया साजणी,

उनपावसाच्या सरीत जाऊ चिंब भिजूनी.


टप टप वाजूनी टपोरे थेंब काय सांगती बोलणं,

तुझ्या नि माझ्या प्रीतिसंगम भेटीचे मधुर गीत असेना.

फुलवून पिसारा मयुर नाचतो रानावनातून,

तयास पाहून शिरशिरी भरते लांडोरीस लाजून.


पावलातील नुपूर सांगती अनुरागाचे गीत,

त्या गीताच्या तालावर ती हृदय माझे डोलल.

कोगुळ बोले कुहूकुहू काय सांगतो कानात,

तुझ्या नि माझ्या मिलनाचा आला सोनेरी हा क्षण.


नजर भिडता नजरेस भिजल्या देहाची आरपार,

असा क्षण ना पुन्हा सखये जवळी ये लाजून.

गर्जून सांगे मेघराज मज पाऊले टाक तू जपूनी,

घाबरु नको सखये साजणी वरीतो आज तुला मी.


असे अनोखे मिलन झाले अशा कोणत्या क्षणी,

आकाशातून टाके मंगल अक्षता पानकळा डोईवरी.

असेच प्रेम करशील सखया मजसवे जीवनात,

म्हणूनच अर्धांगी करून नेईतो  मी घरास.

 कवी- निशिकांत हारुगले

साजण येती घरा

 साजण ऐती घरा.


फुलला पलाश या चैताच्या मासी,

सांगतो आकर्षून आला वसंत घरी.

गुढ्या तोरणाच्या सणात, दारी सुंदर रांगोळी,


शृंगार करुनिया नार उभी या दारी.

भरल्या गोकुळात सौख्य नांदावे घरी.


देखण्या अबोलीचा गजरा माळून शिरी,

वेणी बांधते हसून आरशात पाहुनी.


ती नाजूक चरणे घुटमळत दारी होती.

वाट पाहते कोणाची, येईल सांगा कोणी?


गूज कोगुळ गातो, बोलून सांगे निरोप.

येईल साजण तुझा, आज तुझला भेटायला.


दारी येता घरधनी, दूर देशाहून परत.

पाहता होते तृप्त, आज आसुसलेले मन.


तुम्हा पाहता लोचने झाली तृप्त,

काळजाच्या स्पंदनानी केले हसून स्मित.


नको सोने नाणे मज, नको सुंदर पैठणी.

तुम्हा पाहता सखया, वाटे स्वर्ग आला घरी.


आज पाडव्याच्या दिवशी, करते पुरणपोळी,

कडू गोड आठवणींचे,  सौख्य नांदावे या घरी.

निशिकांत हारुगले 

बेधुंद हवेच्या बहरातूनी

 बेधुंद हवेच्या बहरातूनी,


बेधुंद हवेच्या बहारतूनी, 

बोलती श्वास बंधने ही.

येऊनी तू या सांजवेळी, 

गूज बोलावे या कानामधी.

विरहानल्या या वेड्याजिवा, 

सुखावते तुझी नेत्र पालवी.

तापला तो रवी जातो ,जळा खालच्या घरी.

बसुनी छेडीतो झंकार मी,

शीतल या संध्येवेळी.

माझीच तू सखे साजणी,

या हृदयाची तू स्वामींनी.

बेधुंद हवेच्या बहरातूनी…


केलेस तू मदहोश मला,

दाखवुन तुझी मंद स्मित ही.

येतेस का सांजवेळी या,

भेटायला त्या बकुळी खाली.

सुचेल धुंद तराणे मज,

गाण्यातले तुला पाहता गडे.

बेधुंद हवेच्या बहरातूनी… …


मी दिलेल्या धुंद मोग्ऱ्याचा,

वास आठवतो का सांग तुला.

माळलेला तो गजरा पाहून,

वेड्या झाल्या माझ्या आशा.

होकार मज कळला तुझा,

काही न बोलता त्या अधरातून.

बेधुंद हवेच्या बहरातून … …


वेडावल्या या सागरी लाटा,

गाज सुमधुर बोलती त्या.

वेड्या होऊन येती भेटायला,

त्या अबोल कातळ किनाऱ्याला.

तशीच ये सखे साजणी,

भेटायला या कातर वेळी.

सामावून घेईन तुला ग मी,

त्या दंतुर किनाऱ्यापरी.

बेधुंद हवेच्या बहरातुनी… …

कवी - निशिकांत हारुगले

पेरणीचा पाऊस

 पेरणीचा पाऊस

कस गाभुळल शेत,कसं  टप टप भिजतय थेंबान,

हेंड फोडणारी मुंगलाई घेते विसावा कोपऱ्यात.

पडतो पाऊस टप टप, करतो रान  हे तृप्त,

तांबुळ रानाला सुटलंय सुगंधी अत्तर.

कस गाभुळलं शेत…..


चंद्रकोर शिंगांची बसव अमृत महल माठी,

घाट कुंतलाच्या रानी तिफण ओढती कृष्णाकाठी.

डिरक्या फोडत चालती, बैल  तांबूळ रानात,

हल्यारी देत तिफन चालवतो बळीराज.

हाया हो हाया,  हरुळुक रे हाया.

लिंगोबाच्या राजा, चल रे पोटार जगाचं भराया.

कस गाभुळलं शेत…..


डौलाने चालती बसवान शेतात,

तांबड्या मातीचा गुलाल उधळीत तासात.

पडून पाऊस करी गाभुळ शेत,

चला रे करू धान्याची पेरणं.

साज हयो नवा देऊ डोंगर रानास

हिरवी साडी नेसवू घाट शिव्हारास.

कसं गाभुळलं शेत…. …..


मावळ प्रांतात नांगरल्या रानी,

वरी ,भात ,नागली पहा कशी ही सजली.

काळया कुळतीची वेल, तिला काळू बाळू शेंगांची साथ.

बांधाची ज्वार तिजवर वरण्यााची वेल,

जगदाळा सजती पानापानात,

बोर जांभळ, करवंदीच्या  या देशात.

माळधावनीच्या रानभाज्या असती आमच्या ताटात.

अशा या रानास तुम्ही वरकस म्हणता का  हो पावन.

त्याच्याच जीवावर आमच्या लेकरांच चाललंय पोषण.

कसं गाभूळलं शेत …. ….


कशी तरणीबांड पोर घडती आमच्या मावळात.

भगवा झेंडा फडकवती साऱ्या मुलखात.

 घडली ही पोर सांगा कुणाच्या जिव्हावर,

 अशा या गाभुळल्या धरतीच्या पिकावर.

कसं गाभूळंल शेत…. …..

कवी. - निशिकांत हारुगले

आला वसंत

 आला वसंत

आकाशाची निळीनिळाई बहरली डोळ्यात,

शितल छाया देती प्रेमाची मोहरले रान वृक्ष.

चैताच्या पावन मासात सजला सुंदर साज.

यावे यावे सुमधुर गावे आता प्रणयगीत.

आला वसंत आला वसंत, प्रणय घेऊन

नव जीवनात जातो आनंद देऊन.


सुटता वारे फुटती अंकुर उभ्या या झाडांना

साज शृंगार पानाफुलांचा फुलतो केवडा.

मोहरल्या झाडांचा मार्दव गंध पसरला,

चला लुटुया खजाना या सुंदर धरित्रीचा.

यावे यावे सुमधुर गावे….


उंच उंच जातो हिंदोळा शिवाया आभाळा,

हसत-खिदळत झोके घेऊ आनंद वन भुवनाचे.

सुमधुर गाती किलबिल पाखरे कंठ रुजला गळ्यात.

मधूर गाणे सुमधुर एकावे चिव्याच्या पावरीत.

सांगे यावे यावे सुमधुर गावे…. …..


बहरल्या फुलवेली सुंदर साजऱ्या,

थाट तयाचा उठूनी दिसे नवपानी रानावनात.

भ्रमर फिरती गुंजारवत मंडळ करुनी,

मकरंदाची अवीट गोडी चाखूनी पहात.

यावे यावे सुमधुर गावे…. …..


तुझ पाहता लपूनी सखया,

धड धडते माझे अंतर.

नजर भेटता नजरेस फुटतो अबोल कंठ,

अधरातून निघती माझ्या ते प्रणय गीत.

यावे यावे सुमधुर गावे…. ….

 कवी- निशिकांत हारुगले


प्रेम गीत १

 प्रेम गीत १

कवी : निशिकांत हारुगले

तांबूस निळ्या डोंगर कपारी, फुलली नाजूक वेल कशी.

घाटोऱ्या कातळ रानातून, वहाते जशी नागमोडी झरी.

पांडूर रंगांची रांगडी वेत, ही कटेल मला कशी.

होऊन राणी करेल, राज कवा माझ्या हृदयावरी.


अरे, जा ही घाटोरी कारवी रानातली हाय,

तुझ्या गोड गोड भुलण्याला फसायची नाय.


मनाने प्रामाणिक असणारा, माझ्यावर प्रेम करणारा,

कष्टाची भाकर खाणारा, माझ्या मनावर राज्य गाजवणारा,

असा असेल माझा घरधनी, मी होईन त्याची राणी.


कष्टाची भाकर मिळविण मी, महाल सुंदर बांधीन मी.

तुला राणीवाणी ठेवूनी ,बुलेटवरून फिरविन मी.

शिव चरणाची आन, भगव्या पतकेचा मान.

सुखी स्वराज्याची शान, तुला सुखात ठेवीन ग, राणी सुखात ठेविन ग.


तुझ्या शराला मी र गावायची नाय. वाघीण ही घाट कुंतलाची हाय.

अरे, जा ही घाटोरी कारवी रानातली हाय.

तुझ्या गोडगोड बोलण्याला फासायची नाय.


मल्लखांबी कसरत करणारा, व्यसन वाईट न करणारा.

वेताची काठी फिरविणारा, अचूक संधान साधणारा.

गर्व कधी न करणारा, सगळ्याच्या कामी येणारा.

उद्योग स्वतःचा उभारणारा, आहे रांगडा मावळा मी.


माझ्या मागं लागल्यात शंभर पोरी,

परी जीव माझा जडलाय तुझ्यावरी.

होकार दे आता लवकरी, नाहीतर निघालो माघारी.


नको रे जाऊ माघारी, घाल देवाच्या साथीनं मंगळसरी.

करून मला रे तुझी जाया , नांदाया ने रे तुझ्या घरी.


जोडी ही रांगडी जमली ही, आशीर्वाद द्या हो मंडळी.

सुखाचा संसार कराया, वरात चालली सासरी.

कवी. : निशिकांत हारुगले

पतंग मैत्री

  तुझे पाय लागले आभाळी, मी नाचतो धरणीवरी. किती घेशील गरगर गिरक्या, तुझी वेसण  माझ्या करी. तूच माझा अबोल सखा , बालपणीचा साथीदार. वाटले तुझ्या...